सोमवार, २४ मे, २०१०

विचार मंथन : माणूस का जगतो?

मधंतरी एक मराठी पुस्तक वाचताना, माणूस का जगतो? असा प्रश्न समोर आला आणि डोक्यातील विचारांचे चक्र जोराने फिरू लागले. बराच विचार करून करून मी परत परत याच निष्कर्षापर्यंत येत होतो. आत्ता तेच विचार मंथन तुमच्या समोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे...तुम्हाला या सगळ्यावर काय वाटते ते जरूर कळवा यामुळे तुमचे आणि माझे विचार अजून समृद्ध व्हायला मदत होणार आहे...

माझ्या मते, जर माणसाला जगायला लागणाऱ्या गोष्टींची यादी केली तर तीन गोष्टी अथवा भावना यांचा क्रमांक सर्वात वर ठेवावा लागेल.

आठवणी : कोणताही मनुष्य आठवणींशिवाय जगू शकत नाही. तुम्ही म्हणाल कसे काय...? आपण तर बरेचदा काही आठवणी कायमच्या पुसून टाकता आल्या तर किती बर होईल असा विचार करत असतो मग आठवणीशीवाय माणूस जगू शकत नाही हे कसे काय...? तर मग असे करू स्वतःला काहीही आठवत नाही असा विचार करू. आपले नाव, गाव , आपण कोण आहोत , कुठे आहोत सगळे विसरलो तर काय अवस्था होईल... कालच जोडीदाराबरोबर घालवलेल्या रम्य संध्याकाळची आठवण मनात ताजी असताना तिचा आठवण अचानक नाहीशी झाली आहे हा विचार तरी कोणी करू शकेल का....? आपल्या आठवणींमध्ये चांगल्या बरोबर वाईट आठवणी सुद्धा साठवलेल्या असतात... चांगल्या आठवणींबरोबर वाईट आठवणी पण आपल्याला जगताना बरीच मदत करत असतात. पूर्व आयुष्यात घडलेली एखाद्या क्षणाची आठवण आयुष्यभराची सोबत बनून जाते उलट एखादी शेवटपर्यंत त्रास देत राहते. कधी निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारी किंवा निराशेच्या गर्तेत ढकलणारी सुद्धा आठवणच......आणि फक्त आठवणींमध्ये अडकलेल्या माणसाला आपण वेड लागले आहे असेच म्हणतो ना...? म्हणूनच आठवणींशिवाय माणूस जगू शकत नाही असे मला वाटते.....यावर व.पु. काळे यांचे एक वाक्य आठवते आहे... " मनुष्याला आठवणी नकोश्या झाल्या की तो आत्महत्येचा विचार करू लागतो...."

स्वप्न किंवा ध्येय : प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काहीतरी करायचे असते. प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते.. मग ते अगदी शुल्लक का असेना पण असते...मग कोणीतरी आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई वडिलांना सुखात ठेवण्याचे स्वप्न बघतो तर कोणी अंतराळवीर होण्याचे ध्येय / स्वप्न बाळगून असतो तर कोणी आदिवासी भागात "आनंदवन" फुलवण्याचे स्वप्न बघत असतो ... या स्वप्न अथवा ध्येयासाठी आपल्याला होणाऱ्या अपरिमित कष्ट, वेदना, दुःख या सगळ्याकडे दुर्लक्ष करून कोणीतरी आयुष्याची वाटचाल करत असतो...आपल्या ध्येयासाठी / स्वप्नासाठी वेडे झालेले लोक बघितले की स्वप्न / ध्येय याचे महत्व पटल्याशिवाय राहत नाही...आणि आपल्या भारतात तर ध्येयासाठी कितीही (अगदी आयुष्याचाही) त्याग करण्याची परंपरा आहे... ही उज्वल परंपरा डोळ्यासमोर आली की स्वातंत्र्य संग्राम आठवतो आणि मग तर स्वप्न अथवा ध्येय याचे आयुषातले महत्व अजूनच अधोरेखित होते.....

विश्वास (याला बहुदा इंग्रजी मध्ये "Belief System" म्हणतात): जगात चांगल्या बरोबर वाईट गोष्टी, माणसे असतात हे वाक्य बहुदा विश्वास कशाला म्हणतात हे समजवण्यासाठी पुरेसे आहे. प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी विश्वासावर अवलबून राहतो. कसे...? गाडी चालवत असताना चे उदाहरण घेवू... समजा तुम्ही एक गाडी ओलांडून पुढे जात आहात आणि समोरून भरधाव वेगात कार येत आहे तर तुम्ही पुढे जाताना अपघात टाळण्यासाठी वेग वाढवणार की कमी करणार हे कसे ठरवता? स्वतः वरच्या, गाडीवरच्या विश्वासावरच ना...? जर तुम्हाला कोणताही अपघात न होता आपण सुखरूप पुढे जावू शकू असा विश्वास नसेल तर पुढे जाता का....? मग हा विश्वास निर्माण कसा होतो...आपण एखादी गोष्ट ऐकतो, बघतो.. मग त्यावर विचार करतो.. त्यावर आपले मत बनवतो... ती गोष्ट करून बघण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींवर आपला विश्वास ठेवण्याची अथवा त्या गोष्टीकडे बघण्याची पद्धत ठरते... माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडाला तर काय होईल? अडचणीच्या वेळी कोणीतरी मदतीला धावून येईल हा विश्वास संपला तर आल्या प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य कोठून येणार...? आजाराच्या वेळा आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच विश्वास नसेल तर रोगातून बरे होवू शकू का...? काय वाट्टेल ते झाले तरी आपल्या एका हाकेला मित्र धवून येईल हाच विश्वास नसेल तर..? जे देवाला मानतात त्याच्या मनातला देवावरचा विश्वास नाहीसा झाला तर....?दुःखानंतर सुख येते या वरचा विश्वास उडाला तर ते दुःख आपण पचवू शकू का...? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःवरचा विश्वास उडाला तर जगणे किती कठीण होवून बसेल याचा विचार आपण करू शकतो का...? विश्वासराव गेले पानिपतात असे म्हटले तरी कलियुगात कोणावरही अंधळे पणाने विश्वास ठवू नये यावर आपला विश्वास असतोच ना...? म्हणून तर जगातले बरचसे व्यवहार हे विश्वासावर अवलंबून असतात हे आपल्याला मान्य करावे लागेल.... माझा तुझ्या वर विश्वास आहे हे वाक्य ऐकून आपण मांतून सुखावतो की नाही... पण तेच माझा तुझ्यावर मुळीच विश्वास नाही हे ऐकून व्याकूळ व्हायला होते हे पण तितकेच खरे आहे... आणि हे सगळे वाचल्यावर तुम्हाला पण पटेल की जगताना विश्वास किती महत्वाचा आहे....

हे सगळे माझ्या मनातील विचार आहेत. माझे असे प्रामाणिक मत आहे की वरील तीन गोष्टी जर आपल्या आयुष्यातून बाजूला केल्या तर जगण्यातील मजा निघून जाईल...येणारा प्रत्येक क्षण हा याच तीन गोष्टींशी कुठेतरी निगडीत असतो असे मला वाटते...

--
चेतन कुलकर्णी

बुधवार, ३१ मार्च, २०१०

वरातीमागून घोडे

नमस्कार,

परवाच पुण्यनगरीतील "मराठी साहित्य संमेलन" अगदी थाटात पार पडले. उद्घाटनापासून ते सामारोपापर्यंत या संमेलनाची दोन वैशिष्ठ सांगता येतील.
संमेलनास मिळालेला अबल-वृद्धांचा आणि समाजाच्या सर्व थरातून मिळालेला सक्रीय सहभाग....
आणि सुरवातीपासून शेवट पर्यंत या न त्या कारणामुळे घडलेले वाद विवाद...
संमेलनाच्या आदल्या दिवशीच गुटका तयार करणाऱ्या माणिकचंद कंपनीच्या प्रयोजाकात्वावरून गदारोळ झाला. या सर्व प्रकारात संमेलन अधाक्षांचे मत आणि स्वागत समितीच्या अधाक्षांची मते एकमेकांच्या विरोधी होती. एक जण संमेलनाला येताना वारकरी ज्या भावनेने पंढरीची वारी करतो त्या भावनेने यावे अशी भूमिका मांडत असताना दुसरा मात्र सर्व मान्यवरांना अलिशान गाडी व अलिशान (पंचतारांकित) राहण्याची सोय वगेरे विचार मांडत होता. बहुदा हे आणि अजून वाद उघड होवू नयेत आणि आपले हसे होवू नये म्हणून श्री माणिकचंद यांनी प्रायोजकत्व मागे घेत असल्याची घोषणा केली...आणि शेवटी या वादावर पडदा पडला....
संमेलनचे उद्घाटन विंदा करंदीकरांच्या हातून होणार होते पण त्याधीच विंदा आपल्याला पोरके करून गेले.....हा विचार अजून मनात ताजा असतानाच विंदांच्या काव्य-वाचनाचे ध्वनी-चित्रमुद्रण दाखवून विंदांना आदरांजली वाहिली गेली... मग नंतरचे तीन दिवस पुणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले रसिक साहित्य रसात मनसोक्त डुंबत होते... तृप्त होत होते.... मग ते द.म. मिरासदारांचे कथाकथन असेल किंवा मंगेश पाडगावकरांचे किंवा निमंत्रित कवींचे काव्य-वाचन असेल सगळ्यांनीच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली होती...
रसिक या सर्वच कार्यक्रमाचा आनंद घेत असतानाच अचानक मुखमंत्री अशोक चव्हाण येणार असल्याची (ते पण १ दिवस आधीच, बहुधा कार्यक्रमातील बदल दिल्लीवरून सुचवला गेला असावा) बातमी आली.. आयोजकांची पळापळ झाली खरी पण पण त्यांनी योग्य प्रकारे सर्व निभावून नेले.. आणि नंतर समारोपाला श्री अमिताभ बच्चन हे उपस्थित होते. त्यांच्या भारदस्त आवाजातील काव्य वाचनाने कार्यक्रमात रंगत आणली.... आणि संमेलनाचे सूप वाजले...

खरे तर मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला हिंदीतून भाषण आणि कविता वाचन हे थोडे खटकले... अमिताभ हे एक नट म्हणून श्रेष्ठ आहेतच त्यात वाद नाही... त्यांना १ वेळ चित्रपटाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला बोलावणे समजू शकतो पण ज्या माणसाची एक साहित्यिक म्हणून कोणतीच ओळख नसताना समारोपाला बोलवणे निदान मला तरी खटकले... मरठी मातीवर.. महाराष्ट्रावर एव्हडी वाईट वेळ आली आहे का... की इथला एकही साहित्यिक "साहित्य संमेलनाचा" समारोप करण्यास योग्य आहे असे साहित्य संमेलन भरवणाऱ्या एकही व्यक्तीला वाटू नये.... या गोष्टींचे निकष तरी असे काय असतात.... इथे मराठी हृदय सम्राट म्हणून वावरणारे श्री.राज ठाकरे अथवा मराठी चा मुद्दा तुमचा की आमचा यावर भांडणार शिवसैनिक किंवा एकही मराठी साहित्यिक यापैकी कोणीच कसा आवाज उठवला नाही याचे आश्चर्य वाटत आहे...ही नक्की लाचारी आहे का कोणता खेळ तेच कळत नाही... हे सगळे आत्ता बोलून काही उपयोग नाही कारण जे व्हायचे ते घडून गेले आहे... जाहीरपणे हे सगळे बोलायचे म्हणजे नसते वाद ओढवून घ्या... पण हे मन काही शांत बसू देत नाही... म्हणून हा सगळा प्रकार..... आणि नाही म्हणायला आम्ही पण हे सगळे घडत असताना तुकाराम महाराजांच्या "तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे" याचे आचरण करत होतो...आत्ता वरातीमागून घोडे नेण्यात काही अर्थ नाही.......
--
चेतन कुलकर्णी

गुरुवार, ४ मार्च, २०१०

"कट्टा- एक व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा......"

नमस्कार....

परवा संध्याकाळी फोन आला आणि पलीकडून नेहमीचे शब्द कानावर आले " किती वाजता येणार आहेस?" मग काय नेहमीच्या सवयी प्रमाणे आमची स्वारी निघाली. घरात आलेल्या पाव्ह्ण्यानी कुठे निघालास असे विचारू नये असे वाटत असतानाच त्यांनी विचारले... मी काही बोलण्याच्या आधीच आमच्या बंधुराजांनी उत्तर दिले "कट्ट्यावर....." आणि कट्टा कुठे आहे हे सांगितल्यावर घरी आलेल्या पाव्हण्याच्या चेहेऱ्यावरचे भाव मात्र असे काही विचित्र झाले होते की जणू काही आत्ता हा(म्हणजे मी) खून करायला निघाला आहे.....
कट्टा हा शब्द एव्हढा बदनाम असण्याचे कारण काहीही असो... पण सगळेच कट्टे असे बदनाम का? मी पाहिलेल्या कट्ट्यांवर अनेक प्रकराची माणसे येत असतात... अशा कट्ट्यांवर काही "permanent आणि काही temporary member " असतात. माझे असे स्पष्ट मत आहे की कट्टा हे सुद्धा एक व्यसन आहे. माझ्या या मताला अनेक कट्टेकरी मान्य करतील. असे का? अनेक कट्टेकरींची मानसिक स्थिती काहीशी अशी असे......
" रोज कट्ट्यावर जाण्याची वेळ झाली अस्वस्थपणा वाढू लागतो आणि मग खिशातून फोन बाहेर काढला जातो आणि नेहमीच्या मित्रांकडे येणार असल्याची चौकशी करणारा संदेश पाठवला जातो. उत्तराची वाट बघता बघता निघण्याची तयारी होते... आणि मग................"
कट्टा ही काही फक्त तरुणाईची मक्तेदारी आहे असा समज करून घेण्याचे कारण नाही..... रोज संध्याकाळी कीर्तन अथवा भजन साठी जमणाऱ्या ६०-७० वर्षे वयाच्या आज्जी आजोबांसाठी मंदिर म्हणजे कट्ट्याचेच एक रूप आहे....कट्टा आपल्याला मनाने तरुण राहायला मदत करतो... असे जर नसते तर पुण्यातील फर्ग्युसन रस्ता हा वर्षनुवर्षे तरुणाईचा अखंड वाहणारा झरा म्हणून ओळखला गेला नसता....
कट्टा एक अशी जागा ज्या ठिकाणी आपली मते, आपले विचार आणि विचार करण्याची पद्धत ( thought process) एकतर अमुलाग्र बदलते किंवा अधिक पक्की होते. कट्ट्यावर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असतात. विषय कोणताही असो पण सर्व बाजूंनी चर्चा होत असतात.मग विषय सोमोरून जाणारे सौंदर्य स्थळ असेल नाहीतर जागतिकीकरण असेल... पण कट्ट्यावर येणाऱ्या प्रक्तेकाची स्वतःची अशी काही मते असतात...ती चर्चेतून समोर आली की स्वतःची मते तपासून बघण्याची संधी मिळते...अर्थात दरवेळेला असे होतेच असे नाही... पण या जागेवर येण्याने(हो हो.... नुसत्या उपस्थितीने सुद्धा.....) आपल्या जाणीवा समृद्ध होतात. कट्ट्यावर अनेक मित्र भेटतात... कधीतरी असेही कळून जाते की आपल्या बरोबर नेहमी हसऱ्या चेहेर्याने वावरणाऱ्या मित्राला बऱ्याच समस्या आहेत.. आणि मग आपण आपल्या समस्यांचे रडगाणे गाण्यापेक्षा त्यांना हसतमुख राहून तोंड देण्याचा विचार करू लागतो.....कधी कोणाचे राहणीमान आपल्यावर प्रभाव पडून जाते तर कधी कोणाचे शब्द तर कोणाचे विचार..... एकमेकांची टांग खेचताना ( याला चांगल्या शब्दात मस्करी करणे म्हणतात...) आपण दिवसभराचा थकवा, कटकटी, भानगडी, व्याप तणाव ( म्हणजे tensions ) विसरून जातो. त्यावेळी " आत्ताचा क्षण जगणे" म्हणजे काय याचा अर्थ कळतो. कट्ट्यावर जाणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करताना असे लक्षात येते, की थोड्या दिवसात एकदम शामळू किंवा लाजाळू (याला काही जण एकलकोंडा वगैरे म्हणतील) व्यक्ती सुद्धा लोकांत व समाजात सहजपणे मिसळू लागला आहे...
कट्ट्यावर येणाऱ्यांसाठी कट्टा ही व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा आहे अर्थात सोबतीला असणारी संगत ही पण या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचे काम करते. जर चांगली संगत असेल तर तरुणाई (तन आणि मन या दोन्ही अर्थांनी) च्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात याची अनेक उदाहरणे आहेत पण त्याबरोबरच जर संगत चुकीची असेल तर चांगली मुले/मुली वाया जाऊ शकतात. कट्टा ही जागा अशी असते ज्या ठिकणी संगतीमुळे किंवा बघून बघून व्यसने लागण्याची शक्यता असते. याचा अर्थ असा नाही की कट्ट्यावर जाणारे सगळेच अगदी ठार व्यसनी असतात असे नाही.
ज्या लोकांना कट्टा नावाची काही तरी गोष्ट असते हे फक्त ऐकून माहित असते त्यांनी कोणत्याही कट्टेकरी व्यक्तीला सुधारला अथवा बिघडला असे कोणतेही विशेषण चिटकावण्याच्या फन्दांत पडू नये काहीही फायदा होणार नाही...... आणि कट्टेकरी लोकांनी व. पु. काळे यांचे एक वाक्य लक्षात ठेवावे. " माणूस बिघडला असे आपण म्हणतो याचा अर्थ तो माणूस आपल्याला हवे तसे वागत नाही......!!! "

चेतन कुलकर्णी

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

नमस्कार

हा माझा "ब्लॉग" लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. काही चुका झाल्यास समजून घ्यावे ही विनंती.......

बरेचदा मला भेटणाऱ्या अनेक जणांचे निर्रीक्षण करताना मला पडलेले प्रश्न म्हणजे .......
हा माणूस चिडचिड का करतो?
अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर माणसाला राग का येतो...?
का समोरचा माणूस काय म्हणतो आहे हे आपण ऐकून , समजावून घेण्याच्या आधीच त्या बाबतीत आपले मत पक्के करतो?
समोरच्या पेक्षा आपण काहीतरी भारी आहोत किंवा त्या व्यक्तीपेक्षा आपल्याला जास्त कळते हे दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी....?
हे आणि असे अनेक प्रश्न मला नंतर भंडावून सोडतात....पण अनेक वेळा प्रयत्न करूनही या प्रश्नांची मला उत्तरे सापडत नाहीत.
कोणावरही चिडून, ओरडून व रागावून काहीच साध्य होत नाही....पण नाही म्हणायला कधीतरी याचा पण फायदा होतो हे मात्र मान्य करावे लागेल. आपल्याला आपल्या भावनांचा एक हत्त्यार अथवा tool म्हणून वापर करणे हेच या स्पर्धेच्या जगात कामाला येवू शकते. योग्य वेळी योग्य त्या भावनेचा वापर करता येणे हे आजच्या काळाची गरज बनली आहे आणि म्हणूनच आजकाल aptitude test बरोबरच अनेक कंपन्या उमेदवाराचा "IQ , EQ, आणि PQ " सुद्धा तपासला जात आहे....
हे फक्त भावना योग्य ठिकाणी व्यक्त करणे एव्हड्या पुरते मर्यादित नसून मनात साठून राहिलेल्या भावनांचा योग्य वेळी आणि योग्य त्या प्रकारे निचरा होणेसुद्धा महत्वाचे आहे. असे न घडल्यास अनेक गोष्टी मनात साठत जातात आणि त्या मुळे येणारा तणाव वाढत जातो. हाच तन सहन न झाल्याने अत्माहात्यांसारखे विचार मनात येवू शकतात.
या व अशा अनेक गोष्टीवर आपल्या भोवतालचे जग "slow down" करणे हा एक उपाय असू शकतो... म्हणजे सुरुवात स्वतापासून करायची... बोलताना, चालताना अथवा कोणतीही कृती करताना सगळ्या गोष्टी सावकाश करायच्या.... शब्दांवरचे आघात, आपला स्वर, आपला बोलण्याचा व चालण्याचा वेग हे सगळे कमी करायचे.... अगदी कोणाला तरी शिव्या देण्याचा प्रसंग आलाच तरी "देणाऱ्या पेक्षा घेणाऱ्याला आनंद व्हायला पाहिजे....." एकदा हे जमले की मग पुढे होणाऱ्या गोष्टीवर जास्त चांगल्या पद्धतीने सारासार विचार करता येतो.....
आणि शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हे माहित असूनही सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात याव्या यासाठी प्रयत्न करत राहणे हे नक्कीच आपल्या हातात आहे......

--
चेतन कुलकर्णी

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...